धुळे जिल्ह्यातील दलित समाजाची बोली : अहिराणीचा सामाजिक भेद
प्रत्येक समाजाची स्वत:ची अशी वेगळी बोली असते. त्या बोलीचा वर्णनात्मक पद्धतीने जसा अभ्यास करता येतो, तसा सामाजिक अंगानेही करता येतो. धुळे ग्रामीण परिसरातील दलित-महार जातीची बोली अहिराणी असली तरी तिच्यातील सामाजिक - सांस्कृतिक - धार्मिक घटकांच्या वेगळेपणामुळे त्या जातीच्या अहिराणी बोलीत लक्षणीय वेगळेपण निर्माण झालेले आढळते. हे वेगळेपण धर्मांतरापूर्वीच्या गावकुसाबाहेरील जगण्यातून व धर्मांतरानंतरच्या पाली भाषेच्या संपर्कातून आलेले आहे. म्हणून एकाच गावातील महार जातीतील लोक व महारेतर जातीतील लोक वेगवेगळी अहिराणी बोली बोलताना आढळतात. या वेगळेपणाला अहिराणी बोलीचा ठळक 'सामाजिक भेद' म्हणून नोंदविता येईल.भाषा आणि संस्कृती यांचा परस्परसंबंध किती घनिष्ठ आहे हे सर्वश्रुत आहे. 'संस्कृतीचे व्यक्त रूप म्हणजे त्या समाजाची बोली होय'. (कालेलकर १९६४, पृष्ठ ५८) प्रत्येक समाजाची विशिष्ट संस्कृती असते, विशिष्ट सामाजिक प्रथा, परंपरा, लोकसंकेत, रीतिरिवाज असतात. विशिष्ट लोकधर्म असतो. त्यांतून त्याची बोली वेगळेपण धारण करीत असते. 'बारा कोसांवर भाषा बदलते' असे विधान जेव्हा केले जाते, तेव्हा त्यात 'भौगोलिकता' अधोरेखित होते; तसेच 'प्रत्येक समाजाची किंवा जातीची बोली वेगळी असते', असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात 'सामाजिकता' अनुस्यूत असते. म्हणून भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासापेक्षा ही दिशा वेगळी ठरते.
हिंदू समाजाचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी 'जात' आणि 'व्यवसायसाम्य' यांवर आधारलेले अनेक वर्ग आपल्याला दिसतात. समान रूढी, चालीरीती त्याचप्रमाणे इतर अनेक बंधनांनी एकत्र सहजीवन जगावे लागत असल्यामुळे, एका जातीतील व्यक्तींना जी वैशिष्टये प्राप्त होतात, त्यांतली काही भाषिक स्वरूपाची असतात. या संदर्भात ना०गो० कालेलकर (१९८२, पृष्ठ ५८) म्हणतात, ''जातिबाह्य प्रवृत्तींचा निषेध, प्रसंगी त्याविरुद्ध होणारे कडक इलाज आणि जातीच्या पंचांकडून होणारे नियमन, यांमुळे जातिसंस्था संघटित आणि चिवट झाली. याचा परिणाम म्हणून इतर अनेक वैशिष्टयांप्रमाणे अंतर्गत विनिमयासाठी काही बाबतीत वापरला जाणारा 'शब्दसमूह' हे प्रत्येक जातीचे काही प्रमाणात वैशिष्टय ठरले.''
ही परिस्थिती आजही आहे. आज जातिनिष्ठ धंदा किंवा धंदानिष्ठ जात पूर्वीइतक्या चिवट स्वरूपात नसेल; पण तरीही एकच धंदा करणार्या व्यक्तींना कार्यपरत्वे एकत्र येऊन विनियम करण्याची आवश्यकता कायमच आहे. भाषेचा हा विशिष्ट उपयोग त्या-त्या वर्गाच्या किंवा जातीच्या गरजेतून निर्माण झालेला आहे. मानवी प्रवृत्तींच्या प्रत्येक क्षेत्रात काही अंशी एका विशिष्ट प्रकारच्या अभिव्यक्तीची गरज असते; आणि त्या दृष्टीने भाषेला किंवा बोलीला वेगळे वळण देणे भाग असते. हा नियम समाजात सुरू होणार्या नव्या प्रवृत्तींनाही लागू असतो. प्रवृत्तींचे क्षेत्र अधिक विस्तृत झाले किंवा समाजरचनेत काही परिवर्तन घडून आले, आणि त्याचा ठसा भाषेवर उमटला नाही, असे कधी होत नाही. दलित-महार समाजाचे धर्मांतर झाले. त्यानंतर बौद्ध धर्मातील आचारपद्धती या समाजाने काही प्रमाणात स्वीकारली. त्याचा परिणाम महार समाजाच्या बोली भाषेवर झालेला दिसून येतो. उदा० तथागत, भिक्खू, उपासक, आयुष्यमान, कालकथित, त्रिशरण, पंचशील, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, परित्राणपाठ, जयमंगल अष्टगाथा, जलदान विधी इत्यादी अनेक पाली वाङ्मयातील शब्द महार समाजाच्या बोली भाषेत रूढ झाले आहेत.
जातीच्या विशिष्ट प्रवृत्तींसाठी उपयोगात आणल्या जाणार्या भाषेच्या रूपाला आपण त्या जातीची 'लोकबोली' म्हणतो. यातल्या काही प्रवृत्ती समान पातळीवर असतात; त्यामुळे ते शब्द तेवढे दुर्बोध वाटत नाहीत. परंतु काही गोष्टी त्या विशिष्ट जातीपुरत्याच सीमित असतात, म्हणून त्यांचे वाचक शब्द दुर्बोध वाटतात. उदा० पूर्वीच्या काळी महार जातीचा प्रमुख आहार 'गायीचे मांस' हा होता. पिढ्यानपिढ्या हा समाज गाय किंवा बैलाचे मांस खात आला आहे. जिवंत प्राण्याच्या मांसाला 'हलाल मांस' म्हणतात; तर मेलेल्या प्राण्याच्या मांसाला 'पड' असे म्हणतात. धुळे जिल्ह्यातील महार जातीच्या बोलीत गाय किंवा बैलाच्या मांसासाठी 'शाक' हा वैशिष्टयपूर्ण शब्द आढळतो. 'शाक' म्हणजे गुराचे मांसच; दुसरी भाजी नव्हे. 'शाक' संदर्भात विपुल शब्दसंपदा या बोलीत आढळते. त्या शब्दांचे अर्थ महारेतर जातींना कळत नाहीत, एवढे वेगळेपण त्यात आढळते. जसे - चान्या, खांडर्या, खूर, डल्ल्या, चिच्चू, मुंडं, पिंडं, पार, डील, फफसे, कलेजा, चिलमट, चिचडा, नया, रगती, मांदं, इत्यादी आहारविषयक शब्दसंपत्ती आढळते.
समाजाच्या वेगवेगळया घटकांची ओळख करून घेणे, वेगवेगळ्या प्रदेशांत विखुरलेल्या समाजातील वर्गांची ओळख करून घेणे, म्हणजे त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या सवयींचा अभ्यास करणे होय. अमुक ठिकाणचे, अमुक जातीचे, वर्गाचे लोक कसे वागतात, पोशाख कसा करतात, काय जेवतात, चरितार्थ कसा चालवतात, त्यांची कुटुंबपद्धती कशी आहे, त्यांच्या विवाहसंस्थेचे स्वरूप कसे आहे, त्यांचे सण-उत्सव, लोकदैवते कोणती आहेत, त्यांच्या नवस-सायासाच्या पद्धती, मर्तिक प्रथा इत्यादींबाबत ते कोणत्या रूढी पाळतात, हा अभ्यास पुष्कळ लोक करतात. परंतु संस्कृतीच्या या सर्व अंगांचे स्वरूप ज्यातून व्यक्त होते त्या अपरिहार्य माध्यमाचा, म्हणजे भाषेचा अभ्यास मात्र कोणी करत नाही. ज्यांना आपण मागासलेले समजतो, त्या व्यक्तींच्या तोंडी असणारी शब्दसंपत्ती, त्यांच्याविषयी उत्सुकता दाखवून जर आपण पाहिली तर नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.
बोली आणि समाज यांतील परस्परसंबंध अतिशय घनिष्ठ असतात. त्यामुळे बोलणार्या व्यक्तीच्या बोली भाषेतून त्याचा समाजच प्रकट होत असतो. समाजात अनेक कारणांमुळे वेगवेगळे स्तर निर्माण होतात. शिक्षण, व्यवसाय, जाति-जमाती, धर्म इत्यादी अनेक कारणांमुळे वेगवेगळे स्तर निर्माण होतात. या स्तरांची भाषापद्धती भिन्न-भिन्न असते. काही बाबतीत जाणवण्याइतपत वेगळेपण असते. एकाच गावातील किंवा परिसरातील बोली भाषा जाति-जमातींनुसार 'वेगळेपण' धारण करते. अशा प्रकारचे वेगळेपण धुळे परिसरातील महार जातीच्या अहिराणी बोलीच्या बाबतीत सोदाहरण सांगता येईल.
अहिराणी बोली ही खानदेशातील, त्यातल्या त्यात धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण बोली आहे. या बोलीचे विभागानुसार अनेक भेद दृष्टीस पडतात. अहिराणी बोलीत विभागानुसार जसे 'प्रादेशिक भेद' निर्माण झाले आहेत तसेच जाति-जमातींनुसार 'सामाजिक भेद' निर्माण झालेले आहेत.
दलित जातींतील 'महार' ही एक वैशिष्ट्यपूर्ण जात आहे. या जातीची विशिष्ट अशी जीवनपद्धती होती व आहे. ही विशिष्ट जीवनपद्धती अस्पृश्यता, गावकुसाबाहेरचे जगणे यांतून निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे धर्मांतरातून बौद्ध जीवनपद्धतीच्या स्वीकारामुळे या जातीच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक गोष्टी इतर जातींपेक्षा पूर्णत: वेगळ्या झाल्या आहेत. ह्या सामाजिक वास्तवाला व्यक्त करणारी त्यांची अहिराणी बोलीही वेगळी झाली आहे. हे 'वेगळेपण' अहिराणी बोलीचा एक ठळक 'सामाजिक भेद' म्हणून नोंदविता येईल.
धुळे जिल्ह्यातील महार जातीच्या अहिराणी बोलीत असे काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत की, ते महारेतरांच्या अहिराणीत आढळत नाहीत. या शब्दांचा सामाजिक - सांस्कृतिक संदर्भ कळल्याशिवाय त्यांचा अर्थ इतरांना कळत नाही. उदा० आकडी, आठखोय, आवल्या, उचली नवरी, उडती तगारी, काठीघाट, काडीमोड, काढ्या, कासे, कोटम, खूर-मुंडी, गंदोरं, गावकाठी, गायकोयपी, गोर, घरघुशी, घोडनवरी, चलवादी, झाड, ठानं, ढसकन, ढासली, ढेगमेग, देरवट, नाईक, पड, पाचपाल्या, पार, पेवबूड, पोटखालना, फुनकं, बलुतं, बाबत्या, भन्दं, भाट, भादीमाय, महारखोय, महार-चावडी, महारवर, महारवाजा, महार-वाटा, महार-शेवडी, महारीन साडा, महार्या, रंगटाकन, रनबल्या, रांडकुली, रायरंग, रूसकीन नवरी, लंगर, वायनं, शाक, शीवदाबन, शेनकुकू, सरवा, सांगावा, हातबाही इत्यादी शब्दांचे सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ माहीत असल्याशिवाय त्यांचे अर्थ इतर समाजातील अहिराणी बोलणार्या लोकांना कळणार नाहीत.
प्रत्येक जातीची विशिष्ट अशी सामाजिक व्यवस्था असते. धुळे जिल्ह्यातील महार जातीची एक समाजव्यवस्था आहे. या सामाजिक व्यवस्थेचे विवाहप्रथा, मर्तिक प्रथा, लोकदैवते, लोकधर्म, व्यवसाय, अन्नप्रकार, कपडे, सण-उत्सव इत्यादी घटक आहेत. या घटकांचे आकलन 'महार' जातीच्या बोलीतून होते. धुळे जिल्ह्यातील दलित-महार जातीची बोली म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण शब्दांचे भांडार आहे. या शब्दांचे अर्थ याच परिसरातील इतर जातींतील लोकांना जसे कळत नाहीत, तसेच याच जातीतील परंतु दुसर्या परिसरातील लोकांनाही कळणार नाहीत, एवढे 'वेगळेपण' या बोलीतील शब्दांमध्ये आढळते.
काही विशिष्ट संबंधावर आधारित अशा शब्दांचा एखादा गट वेगळा करणे शक्य आहे. हे शब्द अनेकदा एखाद्या संकल्पनेशी संबद्ध असतात. अशा शब्दगटाला 'अर्थक्षेत्र' किंवा 'शब्दक्षेत्र' म्हणतात. अशी शब्दक्षेत्रे महार समाजाच्या बोलीतही आहेत. या शब्दक्षेत्रांमधील शब्दांचे अर्थ महारेतर जातीतील लोकांना कळणार नाहीत.
कुटुंबपद्धती आणि बोलीतील शब्द
धुळे जिल्ह्यातील ग्रामीण महार कुटुंबामध्येही पितृसत्ताक पद्धती आहे. त्या अनुषंगाने कुटुंबसंस्थेशी निगडित वैशिष्ट्यपूर्ण शब्द दलित-महार जातीच्या बोलीत आढळतात. उदा० देरवट, पोटखालना, रांडमुंड, लोकसोयर्या, घरघुशी, दूदभाऊ, दूदबहीन, रांडम्या, रांडकुली, रनबल्या इत्यादी.
विवाहप्रथा आणि बोलीतील शब्द
प्रत्येक प्रांताच्या, जातीच्या, धर्माच्या विवाहप्रथांमध्ये विविधता आढळते. ही विविधता त्या-त्या जातीची बोली भाषा प्रकट करताना आढळते. उदा० मांगनं, देखा-पान्थाना, येटायामाना, कुयभाऊ, कुयबहीन, दुजवर, गंदोरं, हायद्या, पहिलंघर, देरवट, पोटले बोल इत्यादी.
अन्नप्रकार आणि बोलीतील शब्द
पूर्वीच्या काळी दलित-महार जातीचा प्रमुख आहार गाय किंवा बैलांचे मांस हा होता. त्यातून विपुल शब्दसंपदा या बोलीत आढळते. उदा० शाक, चान्या, खांडर्या, खूर, पार, चिचडा, नया, रगती, दुबी, आयनी इत्यादी.
अशा प्रकारे घरे, कपडे, व्यवसाय, नवस-सायास, भगताचे विधी, लोकदैवते, सण-उत्सव, लोकधर्म इत्यादी संदर्भातील शब्दसंपत्ती महार समाजाच्या वापरात आहे. धर्मांतरातून, पाली भाषेतून शाब्दिक नवस्वीकृती महार जातीच्या बोलीत झालेली आढळते. तसेच धुळे ग्रामीण परिसरातील महार जातीच्या अहिराणी बोलीत व महारेतर जातींच्या अहिराणी बोलीत उच्चाराच्या पातळीवर व शब्दांच्या पातळीवर वेगळेपण नजरेत भरते. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.
No comments:
Post a Comment